सैराट चित्रपटाच्या पलीकडे
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपट प्रदर्शित होऊन तीन-चार आठवडे झाले. चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर चांगलेच गारुड केले. ऐतिहासिक 'कमाई' करत चित्रपटाने नवा इतिहास रचला. चित्रपटाच्या बाजूने आणि विरोधात बऱ्याच चर्चा होत आहेत. काहीजणांनी चित्रपटाच्या आशयाविषयी आणि त्याच्या परिणामांविषयी प्रामाणिकपणे चिंता व्यक्त केली तर चित्रपटाच्या यशामुळे काहीजणांना पोटदुखी होऊन त्यांना 'संस्कृतीरक्षणाचा' कढ आला आहे आणि काही चिंतातूर जंतूंनी नागराज यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या घटनादेखील चर्चेला घेतल्या आहेत. दोन वेगवेगळ्या जातीतील नायक-नायिका, त्यांचे प्रेमप्रकरण, लग्न आणि त्यातून शेवटी होणारे 'ऑनर किलिंग' अर्थात प्रतिष्ठेच्यापायी केलेला खून, एवढाच विषय घेऊन केलेला हा चित्रपट. चित्रपटाकडे दोन प्रकारच्या नजरेने पाहता येते. पहिली नजर निव्वळ 'कलेची', एक सुंदर कलात्मकरीतीने केलेलं सादरीकरण म्हणून चित्रपट पाहता येतो, त्याचा आनंद घेता येतो आणि त्यातली गाणी म्हणत, गुणगुणत सोडूनदेखील देता येतो. पण दुसऱ्या नजरेने अर्थात 'सामाजिक' नजरेनेदेखील हा चित्रपट पाह